संत सावता माळी - संतवाणी_ Sant Vaani_Sant Sawala Mali

संत सावता माळी 

संतवाणी

आमुची माळियाची जात 

आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥१॥

आम्हां हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलझाडां ॥२॥

शांति शेवंतीं फुलली । प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥

सांवत्याने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥



समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥१॥

कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।

कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।

कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥२॥

कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा ।

कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।

कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥३॥


रचना

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥


मूळ रचना - 
कर्मयोगी श्री संत सावता माळी

श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन महान संत होते. 'कर्मे इशू भजावा ।' या माउलींच्या ओवीप्रमाणे जीवन जगणारे होते. त्यांचा काल साधारणपणे इ.स. १२५० ते समाधी इ.स.१२९५ असा मानला जातो. अरण, तालुका-माढा, जिल्हा-सोलापूर हे त्यांचे गाव होय. सावता माळी यांनी आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. लोकभाषेचा वापर केला तरच या सामान्य समाजाला तत्त्वज्ञानाची उमज येते, अन्यथा ते बोजड होते. तत्कालीन मराठी काव्यामध्ये, भाषेत नव्या शब्दांची, नव्या अलंकाराची भर पडली. सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरव यांनी लिहून ठेवले.

'साव' म्हणजे शुद्ध, पवित्र. महाराज नावाप्रमाणे होते. 'स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयाव: ॥' या गीतेतील श्लोकाप्रमाणे त्यांची जीवनशैली होती. आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग करावे, त्यात टाळाटाळ करणे म्हणजे अधर्म होय. म्हणून त्यांनी कधीही पंढरपूरची वारीही केली नाही. कारण अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. 'वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी' ही त्यांची प्रतिज्ञा होती. 'स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ।' 'सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ।' अनासक्त वृत्तीने, ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो. 'प्रपंच साधूंनी परमार्थ केला । तो नर भला भला रे भला भला ॥', असे एका कवीने म्हटले आहे. ते सावता महाराजांच्या जीवनात यथार्थ लागू पडते. यातून त्यांची जीवननिष्ठा दिसून येते. छांदोग्य उपनिषदात नारद-सनत्कुमारांच्या संवादात असे म्हटले आहे कि 'यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति, भूमैव सुखं भूमा त्वेव विजिज्ञासितव्य: ।'. व्यापकत्वातच सुख आहे. अल्पत्वत सुख नसते आणि व्यापक एक ब्रह्म आहे. तदभिन्‍न सर्व मिथ्या असते. तो परमात्मा सर्वत्र आहे. फक्त तशी दृष्टी असावी लागते. प्रत्येक भूतमात्रात एक भगवंतच आहे. हे एकदा कळले कि मग त्याने मंदिरात जावो अथवा न जावो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, 'मग तू राहे भलत्या ठायी । जनी वनी खाटे भुई ॥'. तो कुठेही राहिला तरी त्याच्या जीवन्मुक्तीमध्ये काहीही फरक पडत नाही. वारी करूनही जर आत्मदृष्टी आली नाही तर ती वारी म्हणजे फक्त येरझार ठरते. 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव । देव अशाने भेटायचा नाही रं । देव बाजाराचा भाजीपाला नाही रं ॥' हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे म्हणणे एकदम खरे आहे, म्हणून सावता महाराज पंढरीला गेले नाही व त्यांना ती आवश्यकताही नव्हती. त्यांनी तो भाव त्यांच्या अभंगात प्रगट केला आहे.

'सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोविला मळा ॥' माळ्याच्या जातीत जन्माला आलेलो आहे. आमचे कर्तव्य म्हणजे शेती करणे, शेतकरी खरे तर अन्‍नदाता आहे. तो बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवतो व प्रथम प्राधान्य शेतीला देतो. अगदी तुकाराम महाराजही म्हणतात, 'मढे झाकोनिया करिती पेरणी । कुणबियाची वाणी लवलाही ॥' कर्तव्य कर्म चुकवायचे नाही, ही संतांची ग्वाही आहे. सावता महाराजांनी शांतीररूपी शेवंती फुलवली, प्रेमरूपी जाई उगविली, लसूण-मिरची-कोथंबीरीमध्ये त्यांनी त्या व्यापक हरीला पाहिले. त्यांची पंढरी व्यापक होती. एकद्देशी नव्हती. तुका म्हणे, 'आम्हा ब्रह्माण्ड पंढरी ।'. सावता महाराजांनी जसा भौतिक मळा केला तसाच अध्यत्मिक क्षेत्रात भक्तीचा मळा केला व जगाला व्यापकत्वाचा आदर्श घालून दिला. ही त्यांची प्रतिभा अनुभूती होती. त्यामुळे त्यांना पंढरीला जाण्याची आवश्यकता नव्हती. अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढली. बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद करायला लावली. सावता महाराजांच्या मळ्यात ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज आदि तत्कालीन सर्व संत यायचे व तेथे संत मेळावा भरायचा. अध्यात्मिक सवांद व्हावयाचे. नामदेव महाराजांचे कीर्तन महाराजांच्या मळ्यात होत होते. त्या सर्वांचा एकोपा होता. कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. किंबहुना शांतीचा संदेश या संत मेळाव्यातून जात असे. आता मात्र संत सुद्धा एकत्र येणे अवघड होत आहे. विविध पक्षाचे सुद्धा संत महंत झाले आहेत, हे दुर्दैव आहे.

भगवतगीतेमध्ये म्हंटले आहे, 'सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।'

(२/३८) अगदी याचप्रमाणे सावता महाराज जीवनाचा सहज सोपा सिद्धांत सांगतात,

समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्‌गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥

तुकाराम महाराजही हेच सांगतात. 

'ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥' 

संतांची सर्वत्र एकवाक्यता असते. परंतु आता मात्र समाजात चित्र वेगळे दिसू लागले आहे. जातीयवाद भयानक वाढला आहे. सर्व क्षेत्रात जातीभेदाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. अगदी संतांना सुद्धा जातीजातीमध्ये विभागून ठेवले आहे, हे विदारक आहे.

 'संत दिसती वेगळालेले । परी ते स्वरूपी मिळाले ॥'

वारकरी संतांनी एकात्मकतेचा संदेश दिला आहे.

श्री संत शिरोमणी सावता महाराज वयाची ४५ वर्षे या अवनितालावर राहिले व त्यांनी इ. स. १२९५ साली आषाढ कृ. १४(१०-८-१८) या दिवशी निजधाम गमन केले. अशा या कर्मयोगी महात्म्याला अंनत कोटी दंडवत.



कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी

कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू । अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी । अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥


भावार्थ 
सांवत्याने केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥

आज आषाढ कृष्ण चतुर्दशी, श्रीसंत सांवता महाराजांची ७२३ वी पुण्यतिथी.

श्रीभगवंतांना वैविध्याचे प्रचंड प्रेम आहे. म्हणूनच तर त्यांनी आपल्या प्राप्तीचे असंख्य मार्ग सांगून ठेवलेले आहेत. या सर्व मार्गांचे दिग्दर्शन करण्यासाठी श्रीभगवंतांच्याच प्रेरणेने, एकेका महात्म्यांनी अवतरून तो तो मार्ग स्वत: अवलंबून त्याविषयी इतरांना मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हाच जगाचा नियम असल्याने, प्रत्येकाच्या प्रकृतीला अनुकूल होईल, असा उद्धाराचा मार्गही भगवंतांनी निर्माण करून ठेवलेला आहेच. श्रीसंत सांवता माळी महाराज हे श्रीपांडुरंगांचे अनन्य भक्तोत्तम होतेच, पण ते श्रीमाउलींच्या 'कर्मे ईशु भजावा ।' या सिद्धांताचे पालन करणारे होते. त्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातूनच श्रीपांडुरंगांची उपासना केली. पंढरपुराच्या जवळच असणार्‍या अरण या गावी राहणारे श्री सांवता महाराज, आयुष्यात कधीच पंढरीला दर्शनासाठी गेले नाहीत, असे सांगितले जाते. कारण त्यांचा पांडुरंग त्यांना सदैव समोरच दिसत होता. आपला स्वानुभव सांगताना ते म्हणतात,

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळां ॥४॥


माळियाची जात असल्याने सांवतोबा आपल्या मळ्यातच पंढरीचा अनुभव घेत होते. श्रीगुरुकृपेने त्यांच्या दृष्टीला सर्वत्र ते सावळे परब्रह्मच प्रतीत होत होते. म्हणूनच तर, मळ्यात लावलेला कांदा, मुळा, कोथिंबीर, मिरची ही झाडेही त्यांच्यासाठी विठ्ठलरूपच होती. त्या झाडांची निगा राखण्याची साधने असणारी मोट, मोटेचा नाडा, विहीर हे सर्वच त्यांना पंढरीरूप वाटत होते. सांवता महाराज म्हणतात की, मी असा मळा केला व त्याद्वारेच माझा गळा विठ्ठलपायी गोविला.

गळा हे त्यांच्या सर्वस्वाचे द्योतक आहे इथे. त्यांनी आपले सर्वस्वच विठ्ठलपायी सर्वभावे समर्पिले व त्यामुळे तेही अंतर्बाह्य विठ्ठलरूपच होऊन ठाकले होते. स्वत:च विठ्ठलरूप झाल्यावर, त्या परमात्म्याचा अद्वैताने पूर्णानुभव घेतल्यावर, पुन्हा पंढरीतील विटेवरचा सगुण परमात्मा वेगळा पाहिला काय नि नाही पाहिला काय? काय फरक पडतो? याच भूमिकेने ते कधी पंढरीला गेलेच नसावेत. अर्थात् या गोष्टीला तसा स्पष्ट आधार नाही कुठे. पण म्हणतात की, सांवतोबा कधीच पंढरीला गेले नाहीत, पांडुरंग परमात्माच त्यांच्या भेटीला अरणला येत असे.

"ते पंढरीला कधी गेलेच नाहीत" ही केवळ लोकवदंताच असण्याची जास्त शक्यता आहे. कारण त्याकाळातल्या संतांच्या अभंगांमधून स्पष्ट उल्लेख येतात पंढरीतल्या कार्यक्रमांमधील श्री सांवता महाराजांच्याही उपस्थितीचे. इतर संतांबरोबर तेही सहभागी होत असत पंढरीतल्या उत्सवांमध्ये. श्री सांवता महाराजांच्या ठायी अद्वैताधिष्ठित कर्मयोग पूर्ण बहरलेला होता, हे सांगण्यासाठीच केवळ अतिशयोक्तीने तसे म्हटले जात असावे.

सांवता महाराज सद्गुरु श्री माउलींबरोबर झालेल्या तीर्थयात्रेत सहभागी झाले होते. सर्व संतांसोबत तेही आनंदाने हरिभजनात दंग होत असत. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या 'श्रीज्ञानदेव विजय' या महाकाव्यात त्यांनी सांवता महाराजांचे मनमोहक वर्णन केले आहे. सांवता महाराजांचे रूपवर्णन करताना ते म्हणतात, 'जाडे गोरे उंच विशाल । चंदनचर्चित भव्य कपाळ । स्वर जयांचा अतिकोमल ।' (१२.२९). शरीराने जाड, उंच व विशाल अशा सांवता महाराजांचा रंग गोरा होता पण आवाज मात्र अतिशय सुकोमल होता. अहो, ज्यांच्या हृदयी राजस सुकुमार मदनाचा पुतळा कायमचा विराजमान झालाय, त्यांचा आवाजही सुकोमलच असणार ना ! 'श्रीसद्गुरुकृपेने ज्ञानोत्तराभक्तीची परिपूर्ण प्राप्ती झाल्यावर त्या भक्ताचे अंतर्बाह्य विश्वच प्रेममय होते, मधुरातिमधुर होऊन जाते, त्याचा आवाज अतीव गोड होतो, शरीर लोण्यासारखे मऊ होते', असे प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी 'की भक्तिसुखालागी' या ओवीवरील आपल्या प्रवचनात सांगितलेले आहे.

श्रीसंत सांवता महाराजांनी आपल्या निर्याणाचा अभंगच रचलेला आहे. त्यानुसार मन्मथ नाम संवत्सरात, शके १२१७ म्हणजेच इ.स.१२९५ मधील आषाढ कृष्ण चतुर्दशीला सूर्योदयसमयी वायू निरोधन करून कुंभक साधून त्यांनी आपले प्राण स्वरूपी मिसळून टाकले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेण्याच्या एक वर्ष आधी श्री सांवता महाराजांचे निर्याण झाले. त्यांची समाधी अरण गावी असून आज तेथे मोठा उत्सव संपन्‍न होतो.

सांवता महाराजांचे समग्र चरित्र हा सद्गुरु श्री माउलींच्या 'तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागीं ॥' (ज्ञाने.१८.४६.९१७॥) या ओवीचे साक्षात् आदर्श उदाहरणच आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या दिव्य चरित्राचे रोजच्या कर्मांमध्ये मननपूर्वक अनुसंधान ठेवले पाहिजे. म्हणजे मग आपली ती बंधनकारक कर्मेच आपल्या मोक्षाला कारण होतील.

आजच्या पावन दिनी, प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथांनाही आपल्या पोटात लपवून ठेवणा-या परमभागवत श्रीसंत सांवता महाराजांच्या श्रीचरणीं, त्यांचे पावन नामस्मरण करीत प्रेमभावे दंडवत घालू या व त्यांच्या उपदेशानुसार समयाला सदैव सादर होऊन देवांच्याच इच्छेत आपली इच्छा मिळवून राहण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न करून आपल्याही आयुष्याचे सोने करू या !

 ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'Lyric गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.



    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे तसेच आपल्या भावी पिढीला यांचे अवलोकन करता यावे तसेच आपली संतांची भूमी आहे आणि ते मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

आपल्या कोकनात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन ' - भजावा  - जपावा आणि  - नमावा म्हणजे  भजन होय. कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात. आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल. या बद्दल आम्हाला सुद्धा खूप आनंद होते कि तुम्ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणत प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला जर तुमची कोणती कविता किंवा गवळण नेट वर टाकायची असेल तर नक्की कंमेकॅन्ट मध्ये सांगू शकता.

No comments

Powered by Blogger.