द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान | सद्गुरुविण ज्ञान काहीं _ संत ज्ञानेश्वर हरीपाठ
आपण ज्ञानेश्वरांच्या हरीपाठातील ९वा अभंग अभ्यासत आहोत
द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान | त्या कैंचे कीर्तन घडे नामी ||
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान | नामपाठ मौन प्रपंचाचे ||
नामसाधना हीच कलियुगातील योग्य साधना आहे हे ज्ञानेश्वर आपल्याला हरिपाठातून विस्तृत करीत आहेत.आपण अनेक तीर्थयात्रा केल्या,ग्रंथ वाचन ,पारायण केले ,अगदी हरिपाठ रोज पठण केला तरीही वाचलेले,पठण केलेले आचरणात आणणे जास्त महत्वाचे आहे.
म्हणजेच नामाची महती कळावी यासाठी माऊलींनी हरिपाठ लिहिला ,जेणेकरून सर्वसामान्यांना नामस्मरणाचे महत्व समजेल व आचरणात आणले जाईल.आपण प्रामुख्याने काय करतो? रोज हरिपाठातील अभंग सुस्वरात गातो.आणि झाला माझा आजचा पाठ असे म्हणतो.पण त्याच्या अर्थापर्यंत पोहोचणे माऊलींना अपेक्षित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आणि हे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय नाम घेतले तरी त्यातून अद्वैत कसे साधणार?
सद्गुरुविण ज्ञान काहीं! सर्वथा होणार नाहीं !
अज्ञान प्राणी प्रवाही !वाहातचि गेलें !
ज्ञानविरहित जे जे केले ! तें तें जन्मासि मूळ जालें !
म्हणौनि सद्गुरुचीं पाऊलें! सदृढ धरावी !
समर्थ रामदास स्वामी
हा भवसागर तरुन जाण्यासाठी सिद्ध श्रीसद्गुरुंची दीक्षा घेणे अतिशय आवश्यक आहे.त्यांनी दिलेली साधना चिकाटीने करणे आवश्यक आहे.यानेच आध्यात्मिक प्रगती होईल.अद्वैत साधले जाईल. याचा अर्थ सद्गुरू शोधाची मोहीम आखायची नाही. ग्रंथ आणि संत हे आपले सद्गुरू आहेत. मानवी रुपातील श्रीसद्गुरुंची प्राप्ती आपली तेवढी आध्यात्मिक उन्नती झाली की होईलच. तोपर्यंत सर्व जगाचे गुरुतत्व असणारे दत्तगुरू आपल्याला मार्गदर्शन करतच असतात. सद्गुरू हवेतच म्हणून कुणाही कडून दीक्षा घेणे चूकच हे ही समर्थच सांगतात. गुरु पारखून करावे असे त्यांनी दासबोधात सांगितले आहे.
विवेकानंदांनी परमहंसांना मला आधी कालीमातेचे दर्शन घडवा असा हट्ट धरला होता. त्यांना जेव्हा दर्शन घडले त्यानंतर त्यांनी परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.
नामपाठ मौन प्रपंचाचे | याचा अर्थ नाम घेत असताना भगवद्भक्तीत तल्लीन झाले की संसाराचा विसर पडतो. नामजपाची गोडी लागण्याआधी रिकामे मन सैतानाचे घर या म्हणीप्रमाणे मनात नाना प्रकारचे विचार घोंगावत असतात. पण नामाचा आनंद मिळू लागला की, संसारातील सुखदुःखांपासून मन अलिप्त होत जाते. कर्तव्यदृष्टीने संसार केला जातो, पण मन मात्र नामातच रत होते.
ज्ञानेश्वर माऊली आपणांस सगुणाचे ध्यान करायला सांगतात.म्हणजे जे नाम घेता त्या दैवताचे सर्वशक्तीरुप स्वरुप डोळ्यांसमोर आणून जप नामस्मरण करावे.ते रुप मनात कोरले जावे तरच प्रत्यय येईल.मुखाने फक्त हरि हरिचा जप सुरु आहे, अन चित्त मात्र अन्यत्रच गुंतलेय असा जप काय कामाचा?
अशा सगुणातील भक्तीचा काय उपयोग होतो? तर सगुण हीच निर्गुणाकडे जाण्याची पायरी आहे हे समजते.यातून सगुणरुपातील ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि भक्ती दृढ होते.निर्गुण निराकार तत्व भक्ताच्या आर्ततेने आळवण्यामुळे त्याच्या आराध्याच्या सगुणरुपात भक्ताला दर्शन देते.समाधीवस्थेकडे वाटचाल सुरू होते.यामुळेच भगवंताशी ऐक्य साधले जाते.आणि या संसाररुपी भवसागरातून अलिप्त होणे जमते.
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment