ठाकलोसे द्वारी। सांडुनियां अभिमान _ संत तुकाराम महाराजा अभंग
दासबोधातील दुसर्या दशकातील 7 व्या समासातील ह्या ओव्या.
तसे तर सत्वगुण हा एक पूर्ण समास आहे. अगदी व्यवस्थितपणे समर्थांनी सामान्यजनांना समजावलेय. आता थोडं आपण सुद्धा समजावून घेऊ
सांडुनियां अभिमान | निष्काम करी किर्तन |
श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||
अंतरी देवाचे ध्यान | तेणें निडारले नयन |
पडे देहाचे विस्मरण | तो सत्वगुण ||
अभिमान सांडणे हे जमायला देहबुद्धी कमी व्हायला हवी. अगदी सहजतेने आपण मी हे कार्य केले असे म्हणतो.हा "मी" तेव्हा संपतो जेव्हा केलेली सर्व कर्मे ही भगवंताच्या कृपेने पार पडतात याची जाणीव तनामनात भिनते.
किर्तन सेवा करणे ही खूप सोपी ही गोष्ट आहे अन तितकीच अवघड ही! जर भगवंताच्या रंगात रंगून अवघा रंग एकच झाला तर वाचेतून भगवंताच्या कृपेने आपोआपच भगवंताची किर्ती, गुणगान रसाळ भाषेत गाता येते.आपल्याला काही करावेच लागत नाही. पण किर्तन करायचे म्हणून ऊभे राहिले अन ते आतून आले नाही तर ते रंगत नाही. शब्दांच्या पसार्यात भाव कुठे तरी हरवला आहे हे जाणवत रहाते व ऐकणाराच्याही मनापर्यंत ते पोहोचत नाही.निष्काम सेवा म्हणून किर्तन सेवा करताना केवळ भगवंताची किर्ती किंवा नाम घेण्यास भाविकांनी उद्युक्त व्हावे यासाठी जो किर्तन करतो, त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झालेले असतात. तेथे सत्वगुणाचा प्रत्यय येतो असे समर्थ सांगतात.किर्तन करणे याचा अर्थ हातात वीणा घेऊन सर्वांसमोर ऊभे राहून सप्ताहात जे किर्तनकार किर्तन करतात तसेच किर्तन करणे इथे अभिप्रेत नाही. किर्तन याचा सोपा अर्थ हरिकथा, हरि गुणगान इतरांना सांगणे!
भगवंतावर निस्सीम प्रेम, विवेकी वृत्ती, परमार्थाची आवड व हरिकथेची गोडी ही सत्वगुणाची लक्षणे आहेत.
असा सत्वगुणी साधक आपल्या अंतरात्म्यात देवाचे ध्यान करण्यात इतका एकरुप होऊन जातो की, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात तरीही त्याला त्याची जाणीव होत नाही.अशा वेळी त्याला देहाचे विस्मरण पडते व तो आणखी आनंदाने भगवंताच्या आराधनेत बुडून जातो.या नश्वर देहाचा असलेला अभिमान गळून पडतो. मी कसा असा तसा आहे किंवा मी कशी इतकी सुंदर आहे... वैगेरे वैगेरे मला चिकटलेली सगळी विशेषणे गळून पडतात. अन खरा मी म्हणजे त्या सर्वव्यापी निराकार निर्गुण भगवंताचा अंश आहे एवढीच जाणीव शिल्लक रहाते तो खरा सत्वगुणी! आणि मग स्वतः ला जाणवलेले हे अंतिम सत्य तो गृहस्थाश्रमी स्वतः कमलपुष्पाप्रमाणे अलिप्त राहून इतरांना आपल्या मुखातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीचे ऐकणारे आस्तिक, नास्तिक किंवा कुणीही आपल्या या वागण्या बोलण्यावर टीका करोत की हे ऐकून अंगिकारोत.. तो स्थिर असतो. समबुद्धीने तो फक्त मानवजन्माचा मुख्य उद्देश समजवण्याचा प्रयत्न करत असतो.
असा सत्वगुणी साधक आपल्या अंतरात्म्यात देवाचे ध्यान करण्यात इतका एकरुप होऊन जातो की, डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात तरीही त्याला त्याची जाणीव होत नाही.अशा वेळी त्याला देहाचे विस्मरण पडते व तो आणखी आनंदाने भगवंताच्या आराधनेत बुडून जातो.या नश्वर देहाचा असलेला अभिमान गळून पडतो. मी कसा असा तसा आहे किंवा मी कशी इतकी सुंदर आहे... वैगेरे वैगेरे मला चिकटलेली सगळी विशेषणे गळून पडतात. अन खरा मी म्हणजे त्या सर्वव्यापी निराकार निर्गुण भगवंताचा अंश आहे एवढीच जाणीव शिल्लक रहाते तो खरा सत्वगुणी! आणि मग स्वतः ला जाणवलेले हे अंतिम सत्य तो गृहस्थाश्रमी स्वतः कमलपुष्पाप्रमाणे अलिप्त राहून इतरांना आपल्या मुखातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बाकीचे ऐकणारे आस्तिक, नास्तिक किंवा कुणीही आपल्या या वागण्या बोलण्यावर टीका करोत की हे ऐकून अंगिकारोत.. तो स्थिर असतो. समबुद्धीने तो फक्त मानवजन्माचा मुख्य उद्देश समजवण्याचा प्रयत्न करत असतो.
ठाकलोसे द्वारी। उभा याचक भिकारी॥१॥
मज भीक काही देवा। प्रेम भातुके पाठवा॥ २॥
याचकाचा भार। घेऊ नये येरझार॥३॥
तुका म्हणे दान। सेवा घेतल्या वाचून ॥४॥
या मागणीपर प्रकरणातील अभंगाद्वारे संत तुकाराम म्हणतात ,
अहो देवा , मी तुमच्या दारात याचक होऊन भीक मागण्यासाठी उभा राहिलो आहे.
मला काहीतरी भीक घाला. ती म्हणजे आपणाविषयीचे प्रेम मजकडे पाठवा
भीक मागण्यास आलेल्या याचकाला हेलपाटे (येरझार) घालायला लावू नयेत त्यांना लगेच दान द्यावे .
शेवटी तुकोबा दानाची व्याख्या करताना म्हणतात याचकाकडून कोणत्याही प्रकारची सेवा न घेता जो त्याला दान देतो तो उत्तम दाता होय.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ।।
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ।।
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचे ।।
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात गृहस्थाश्रम योग्य पद्धतीने कसा आचरावा याचे विस्तृतपणे विवेचन केले आहे.
उत्तम व्यवहाराने धन जोडणे म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करुन धन कमावणे.म्हणजेच गैर मार्गाने, अथवा कुणाला फसवून, लांडीलबाडी करुन, दुसर्याचे हिसकावून घेऊन धन कमावू नये.
तसेच हे उत्तम मार्गाने कमावलेले धन मनात त्याविषयी आसक्ती न ठेवता उदासीन भावाने जो खर्च करेल तोच गृहस्थाश्रम योग्य पद्धतीने अनुसरुन पुढे उत्तम गती प्राप्त करेल.
उदासीन याविषयी समर्थांनी दासबोधात खूप छान समजावले आहे.
सर्वकाळ उदासीन| नाना भोगी विटे मन|
पदार्थी न बैसे चित्त | मनी आठवे भगवंत ||
समर्थ रामदास स्वामी उदासीनतेचे याप्रमाणे वर्णन करतात.
प्रपंची उदासीन होणे म्हणजे नातलगांपासून दूर होणे अथवा त्यांचा द्वेष वा तिरस्कार करणे नव्हे. जो व्यक्ती संसारी उदासीन होतो त्याचे सत्वगुण वाढीस लागलेले असतात. मग अशा व्यक्तींना प्रत्येक माणसात असणारा ईश्वरी अंश दिसू लागतो. तो सर्वांशीच प्रेमाने वागू लागतो. त्याच्या लेखी समोरच्याच्या हातून घडणार्या चुकांना काही महत्त्व उरत नाही.तसेच समोरच्या कुणाला आनंदाचे भरते आले तरीही हा मात्र स्थिरवृत्तीनेच याकडे पहात असतो. तो सर्वां विषयी असणारी कर्तव्ये आत्मीयतेने पार पाडतो, पण त्यात गुंतत नाही. ही कर्तव्ये" मी" केली हा भावही त्याच्यापाशी उरत नाही.असोनि संसारी जिव्हे वेगुं करी...असे माऊली ही हरिपाठात सांगतात. संसारातील सर्व सुखदुःखांची जाणीव त्याला असते, पण त्यामुळे तो आनंदी वा दु:खी होत नाही. आलिया भोगासी असावे सादर अशा वृत्तीने तो वागत असतो. अशा गृहस्थाश्रमी व्यक्तीला संसारी अडचणींचा बाऊ वाटत नाही.
आपल्या हातून चुकूनही कुणी दुखावले जाऊ नये अशा वृत्तीने तो वावरत असतो. उलट आपल्या हातून शक्य असेल तेवढी इतरांना मदत व्हावी अशीच त्याची परोपकारी वृत्ती असते. सत्वगुणी असल्याने परनिंदा, परस्त्री मातेसमान हे सद्गुण त्याच्याकडे असतातच!
फक्त मानवांसाठीच नाही तर पशुपक्षी यांच्यातही असणारा ईश्वरी अंश जाणवून तो त्यांच्याशीही भूतदयेने वागतो.
शांती क्षमा आणि दया | निश्चय उपजे जया |
सत्वगुण जाणावा तया | अंगी आला ||
असे रामदास स्वामी सांगतात आणि अशा त्याच्या आदर्शवत गृहस्थाश्रम व्यतीत करण्याने तो आपल्या वाडवडिलांची किर्ती वाढवतच असतो.
संत तुकाराम महाराज म्हणतात, हेच गृहस्थाश्रमाचे फळ आहे की, या आश्रमात राहून ही जो वैराग्याची प्राप्ती करतो तो पुढील आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी सक्षम झालेला असतो. यासाठी गृहस्थाश्रम योग्य पद्धतीने आचरावा.
Post a Comment