कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥
नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥
नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥ तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥४॥
आपण आपली ओळख करुन देत असताना आधी पूर्ण नाव सांगतो, मग गाव, तालुका जिल्हा, आपले पद, शिक्षण सांगत असतो. आपल्या नावावरून आपण कुणाचे चिरंजीव, आडनावावरुन कुठले घराणे, कुठले गाव, जिल्हा, राज्य समजते. शिक्षण व पदावरुन आपली समाजातील पत समजते. पुढे आपण मला अमूक बहिणभाऊ आहेत, अमूक मुले आहेत अशी नातीगोती सांगतो.
पण ही आपली खरी ओळख आहे का? हेच वरील अभंगावरुन स्पष्ट होते. हा जो स्थूलदेह आपल्याला आपल्या कर्मांचा हिशोब मिटवण्यासाठी व आपल्या अनेक जन्मात केलेल्या चुकीच्या कर्मांनी आपल्या मूळ स्वरुपापासून आपण दूर गेलो आहोत त्या मूळ आनंदमयी स्वरुपात परत येण्यासाठी मिळाला आहे.
आपण जन्माला येताना एकटेच येतो व जातानाही एकटेच जातो. इथे आपले वास्तव्य असते त्या कालावधीत या पाहुण्या आलेल्या स्थळालाच आपण आपले घर समजू लागतो. सभोवताली असणाऱ्या नातेवाईकांना माझी माणसे म्हणतो.त्यांच्यासाठी जीवाचे रान करतो.
हा तो नोहे कांही निराशेचा ठाव|
भले पोटीं वाव राखिलिया||१||
विश्वंभरे विश्व समविले पोटीं |
तेथेची शेवटीं आम्ही असो ||२||
नेणता चिंतन करिता अंतरी|
तेथे अभ्यंतरी उमटेल||३||
तुका म्हणे माझा स्वामी अबोलणा |
पुरवू खुणे खूणा जाणतसे||४||
आपल्या हिंदू धर्मानुसार आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. पण याजन्मी आपली असणारी माणसे मागील अनेक जाऊद्या.. मागच्या जन्मीतरी आपल्या सोबत होती का? हे आपण समजू शकत नाही. पास्ट लाईफ रिग्रेशन करतात, पण तिथे याजन्मीचीच पत्नी गेल्या जन्मी होती असे काही दरजन्मात निदर्शनास येत नाही. आणि एक जन्म भारतात तर दुसरा टांझानिया मध्ये ही होतो. आणि या जन्मी मी पुरुष आहे तर पुढील जन्मीही पुरुष म्हणूनच जन्माला येईन असे काही नाही. रावणाबाबत वाचलेले आठवतेय, त्याच्या आधीच्या जन्मात तो स्त्री जन्मात होता व मंदोदरी पुरुष जन्मात होती.
मी मूळ चैतन्यमयी आत्मा आहे, जो अविनाशी चिरंजीवी आहे.हा स्थूल देह हे माझ्यासाठी माध्यम आहे. जेव्हा पाप अन पुण्य दोन्ही समान 50-50 टक्के होतात तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. फक्त मनुष्य जन्मच आत्म्यावर अनंत जन्मांत झालेले संस्कार मिटवून आत्म्याला त्याच्या मूळ स्वरूपात आणून मोक्षप्राप्ती घडवून देऊ शकतो. किंबहुना तेच मानवदेहात या पृथ्वीतलावर येऊन करण्याचे मुख्य कार्य आहे.
पण हे विसरुन आपण मी- माझे असे करत अहंभावाने या मायाबाजारातच गुंतून जातो.ज्यावेळी हे जग मिथ्या आहे हे समजते तेव्हा आपली खरी ओळख करुन घेण्याचा प्रयत्न केला जातो. भगवंताच्या नामाने हे साध्य होते व सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रगती करु शकतो. वाल्या कोळी नारदमुनींच्या सांगण्यावरुन घरातील सर्वांना विचारु लागला, माझ्या पापात वाटेकरी व्हा. पण ज्यांच्यासाठी तो वाटमारी करत होता त्यापैकी एकजणही याला तयार झाला नाही तेव्हा वाल्या कोळ्याला विरक्ती आली. समजून उमजून विरक्ती आली तर समभावाने सृष्टीकडे, संसाराकडे पहाता येते. स्वस्वरुप समजून येते. मग केलेले प्रत्येक कर्म भगवंतचरणी अर्पण करुन अकर्म कर्म करणे व उन्नत होणे जमू लागते. ही सगळी सृष्टी म्हणजेच मी आहे व माझ्यातही ही सगळी सृष्टी सामावली आहे अशी दृष्टी प्राप्त होते. मग विश्वात्मक देवाची आराधना केली जाते. तिथे स्व शिल्लकच रहात नाही. जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात अशी प्रार्थना केली जाते.
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करु यांसी ।का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥
Post a Comment